होळी | होळी निबंध |Holi Nibandh | Holi Nibandh Marathi | 2025

होळी म्हणजे रंगांचा उत्सव, होळी म्हणजे मनाला ताजातवाना करणारा, विविध रंगात भिजवून टाकणारा सण. होळी म्हणजे उत्साहाला आलेले उधाण, होळी म्हणजे मौजमस्ती, होळी म्हणजे आनंदाची बरसात! हा रंगांचा उत्सव साऱ्या भारतभर लोकप्रिय आहे. अगदी लहान- थोर स्त्री-पुरुष धर्म, प्रांत, जात विसरून या उत्साहात हिरहिरीने सामील होतात आणि जीवनाचा आनंद लुटतात. लहान मुले तर या सणाची चातकासारखी वाट पाहत असतात. मग काय जसजसे दिवस जवळ येऊ लागतात मुलांचा आनंद वाढू लागतो. मित्रांना, सवंगड्यांना, ओळखीच्या लोकांना रंग लावण्यात कोण आनंद मिळतो म्हणून सांगू! अशा वेळेला कोणी माझे कपडे रंगाने खराब झाले तर? माझ्या केसात रंग गेला तर काय होईल? अशा चिंता व्यक्त करत नाही.

Holi Nibandh | होळी | Holi Nibandh Marathi


उत्तर भारतात होळी हा प्रामुख्याने रंगांचा सण मानला जातो. तर महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमी असे दोन वेगळे सण साजरे केले जातात. होळीच्या दिवशी ठिकठिकाणी घरासमोर ऊस उभा करून त्या भोवती गोवऱ्या आणि इतर टाकाऊ अशा जळावू गोष्टी एकत्र करून त्या पेटवल्या जातात. तिला पुरणपोळीचा प्रसाद अर्पण करून भक्तीभावाने नमस्कार केला जातो. खरे तर वाईट विचारांचं दहन करून चांगल्या विचारांची जोपासना करावी होळीचा खरा अर्थ आहे. होळी ही पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेसुद्धा म्हटले जाते.


हिरण्यकश्यपूची बहीण होलिका म्हणजेच ती भक्त प्रल्हादाची आत्या होय. तिला अग्नी देवतेकडून अभयाचे वरदान मिळाले होते. होळी या सणाचा संबंध याच पौराणिक कथेशी लावला जातो. भक्त प्रल्हादाचे नारायणाचे वेेड कमी व्हावे म्हणून हिरण्यकश्यपू म्हणजेच भक्त प्रल्हादचे वडील त्याला नानाविविध शिक्षा देतात. पण प्रत्येक वेळेला तो त्यातून वाचतो. खरे तर प्रत्यक्षात नारायणच त्याला वाचवत असतात. होलिका ही भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नी प्रवेश करते. परंतु तिला मिळालेल्या वरदानाचा इथे काही उपयोग होत नाही आणि भक्त प्रल्हादाऐवजी त्या अग्नीत स्वतः होलिकाच जळून खाक होते. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो असे मानले जाते. म्हणूनच वाईट गोष्टींचा नाश करावा आणि चांगल्या गोष्टींची पाठराखण करावी असा संदेश या सणातून आपल्याला दिला जातो.


पौर्णिमेनंतर येणाऱ्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. पण मुंबई आणि परिसरामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्रात धुळवड साजरी केली जाते त्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. उत्तर भारतीयांच्या प्रभावामुळे हा सण आपल्याकडे धुळवडीच्या म्हणजेच होळीच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जातो. धुळवड म्हणजे जी धरतीमाता आपले भरण पोषण करते. आपल्याला वाढवते, जगवते तिच्या प्रती ऋण व्यक्त करणे होय. म्हणूनच या दिवशी मोठ्या भक्तीभावाने माती कपाळाला लावली जाते. धरतीला तिला वंदन केले जाते.


खरंच रंग ही निसर्गाने माणसाला दिलेली एक मोठी देणगी आहे असेच मला वाटते. आपल्याला सात रंग दिसतात. या सात रंंगांच्या असंख्य छटा दिसतात. खरेेच रंगांच्या बाबतीत आपण किती भाग्यवान आहोत. कारण कित्येक पक्ष्यांंना, किती तरी प्राण्यांना केवळ दोन ते तीनच रंग दिसतात. आपल्याला मात्र सर्व! सात रंग, त्याच्या असंख्य छटा, शिवाय प्रत्येक रंग अनुभवण्याचा आनंद वेगळा. त्यातून निर्माण होणारे भाव वेगळे. आता हेच बघा निळा रंग मनाला शांती देतो. भगवा रंग शौर्याची आठवण करून देतो. पांढरा रंग शांतीचा तर हिरव्या रंगात समृद्धी जाणवते. हिरव्या माळरावर बसून संध्याकाळच्या वेळेला पाहिलेले निळे आभाळ मनाला किती आनंद देते. किंवा समुद्रकिनारी बसून निळे आकाश जिथे टिकलेले आहे त्या क्षितीजाकडे पाहताना निळ्या- निळ्याचा संगम आपल्याला पाहायला मिळतो.

असे हे रंग, माणसाने निसर्गातून भरपूर लुटावे यासाठीच याची योजना केलेली आहे आणि म्हणूनच हा रंगांचा उत्सव आपल्याकडे सुरू झालेला आहे. प्रत्येक रंग जरी मनाला आनंद देत असला तरी, जेव्हा सात रंग एकत्र येतात आणि त्यातून निर्माण होणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते ते मात्र लाजवाबच असते. निसर्गाची किमया किती भारी आहे हे आपल्याला जाणवते. पण ह्या रंगातून प्रतीत होणारे भाव- भावना मानवी आयुष्याला काहीतरी सांगत असतात. जसे प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो एकेका रंगाप्रमाणेच छान वाटतो.

पण जसे सर्व रंग एकत्र येऊन अप्रतिम असे इंद्रधनुष्य तयार होते त्या प्रमाणेच सर्व माणसे एकत्र येऊन अद्भुत असे सुंदर असं कार्य आपण निश्चित पार पाडू शकतो. यासाठी सर्वांनी एकत्र येणे हे फार महत्त्वाचे आहे हा संदेश होळी हा सण आपल्याला देतो असे मला वाटते.


पण आजच्या काळात समाजामध्ये हा सण साजरा करण्याच्या बाबतीत अनेक अनिष्ट प्रथा निर्माण झाल्या आहेत. होळीच्या दिवशी कचरा जाळला जावा, टाकाऊ वस्तू जाळल्या जाव्यात असे अपेक्षित असताना मोठमोठी झाडेच कापून ती जाळी जातात. पर्यायाने पर्यावरणाचा नाश केला जातो. तसेच लोकांना रंग लावताना नैसर्गिक रंग वापरावे असे असताना रसायनाने युक्त असलेले रंग एकमेकांना लावले जातात. जेणेकरून इतरांना इजा होईल. अशा प्रकारचा रंग लावून या सणातून एक प्रकारचा असुरी आनंद घेतला जातो. शिवाय काही समाजकंटक मुली महिला यांच्यावरती अनावश्यक असा रंग फेकणे, पाण्याचे फुगे मारणे असे प्रकार करून त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल करून टाकतात.

खरे तर सण आनंदाने साजरे करायचे असतात, पवित्र भावनेने साजरे करायचे असतात. पण आता मात्र पर्यावरणाचा नाश करून, इतरांना इजा करून,त्यांना दुःख देऊन, माता भगिनींना त्रास देऊन आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनिष्ट प्रथांपासून आपण आपले सण वाचवले पाहिजेत. सणाचे पावित्र्य त्या मागील भावना आपण जपायला हवी ही नव्या पिढीला माझी कळकळीची विनंती आहे.


मला आठवतंय, एकदा होळी या निबंधामध्ये एका मुलाने होळी हा हिंदूंचा सण आहे असं लिहिले होते. तेव्हा त्या शिक्षकांनी वर्गातच असलेल्या सलीम नावाच्या मुलाला विचारले, “काय रे सलीम तू काल रंग खेळलास का? तेव्हा सलीम मोठ्या उत्साहाने आपले रंगलेले हात सरांना दाखवत म्हणाला” काल खूप मजा केली सर!” तेव्हा सर साऱ्या वर्गाला उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो होळी हा हिंदूंचा नव्हे तर रंगांचा सण आहे!

Holi Nibandh | होळी | Holi Nibandh Marathi | Video

Leave a comment

error: