वारी पंढरीची…… एक आगळावेगळा अनुभव !
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात पंढरीच्या वारी इतकं महत्त्व दुसऱ्या कशालाही नसावं. नामदेव, ज्ञानदेवांनी चालू केलेली ही वारी निरंतर अव्याहतपणे गेली साडेसातशे वर्ष सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा सुलतानी राजवटीतील टोळधाड. वारी आपली सुरूच !
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, स्त्री-पुरुष, गरीब- श्रीमंत, तथाकथित उच्च वर्णीयांपासून अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत. समाजपुरुषांच्या उभ्या- आडव्या जगतातील लोक आपापली ओळख विसरून लीन होतात पांडुरंगाच्या चरणी !

आळंदी ते पंढरपूर असा साधारण २०० ते २५०कि.मी. चा पायी प्रवास. ज्ञानदेव, तुकोबाचा जयघोष करीत तो लाखोंचा जनसमुदाय चालत निघतो. कुणी डोक्यावर बाचकी घेऊन, कुणाच्या गळ्यात टाळ- वीणा-मृदंग, तर कोणाच्या माथ्यावर तुळशी वृंदावन! राम कृष्ण हरी चा मंत्रघोष तर निरंतर सुरूच. एका मार्गाने ज्ञानदेवांची पालखी, तर दुसऱ्या मार्गाने तुकोबांची. या दोन संत श्रेष्ठांबरोबरच इतरही अनेक ठिकाणाहून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. वारीत सारी माणसं आपली व्यक्तिमत्वं, ओळख विसरून जातात. तिथं प्रत्येक जण माऊलीच असतो.
एकमेकांना “माऊली” नावाने हाक मारायची, एकमेकांच्या पाया पडायचं, वाटेत मुक्कामी थांबून तिथं जेवण बनवून खायचं, राहुटीत नाही तर उघड्या माळरानावर, आकाशाकडे पाहात-पाहात निद्रेच्या अधीन व्हायचं. हा कित्येक वर्षाचा शिरस्ता. कसली तक्रार नाही, ना कुणाबद्दल मनात राग. मनामनात फक्त पांडुरंगाची आस! त्याचा जय जयकार, त्याचा नाम जप आणि मग त्याच्या नाम नादात सारे वारकरी आपले श्रम, आपली प्रापंचिक आयुष्यातली दुःखं विसरून जातात, विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन जातात.
वारी आषाढात निघते. वर्षा ऋतूचा हा काळ. पावसाचा जोर जरा ओसरलेला असतो. शेतकरी राजा पेरण्या करून थोडासा निवांत असतो. नद्या,नाले,ओढे शांतपणे दुथडी भरून वाहत असतात. नाही म्हणायला एखादा ढग अधून मधून पावसाची रिमझिम बरसात करून जातो. साऱ्या सृष्टीने हिरवी दुलई अंगावर पांघरलेली असते. पशु-पक्ष्यांना मुबलक चारा-पाणी सगळीकडे उपलब्ध असतो. पक्षी आनंदाने विहार करीत असतात. साऱ्या आसमंतात नवचैतन्याचा जणू सळसळता संचार असतो. अन् त्याचंच प्रतिबिंब मनामनात उमटत असतं.
सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद ओसंडून वाहत असतो. निसर्गच्या, ईश्वराच्या प्रति एक प्रकारची कृतज्ञता अनेकांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत असते. अशा नितांत सुंदर, चैतन्यमय, आनंदमय वातावरणात वारी हळूहळू पंढरीच्या दिशेने सरकत असते. प्रचंड गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली दुकानं, गावोगावी ग्रामस्थ मंडळी, विविध संस्थां वारकऱ्यांना उपयोगी सेवा सुविधा पुरवण्यासाठी लोक विनम्रपणे हात जोडून उभे असतात.
पैसा कमवण्याच्या दृष्टीने नाही फक्त वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा हाच मनोभाव त्यांच्या मनात असतो! वारकरी मात्र बेधुंदपणे भजने, राम कृष्ण हरी, ज्ञानदेव-तुकारामाचा घोष करत पुढे पुढे सरकत असतात. वारीत कोण नाटिका सादर करतात. तर कोण भारुडे! कुणी नाचत असतात ते कुणी पथनाट्य सादर करून जनजागृतीचं काम करतात. पण सगळ्यांच्या मनात एकच असतो तो म्हणजे काळा सावळा विठ्ठल!
आश्चर्याची गोष्ट अशी की, एवढा २५० किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा ही वारकरी मंडळी पंढरपुरात पोहोचतात तेव्हा ते देवळात जाऊन मूर्ती पुढे उभे राहून नमस्कार करण्याच्या व त्याच्याकडे काही मागण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एकदाचे पंढरपूरला पोहोचले, दुरून देवळाच्या कळसाचे दर्शन घेतलं की झाली त्यांची वारी.
थोडा वेळ त्या भूमीत थांबून निघतात ते परतीच्या प्रवासाला. म्हणूनच मला तरी वारी हा प्रकार धार्मिकतेच्या अंगाने जाणारा नसून तो जास्त करून सांस्कृतिक परंपरेच्या अंगाने जाणारा वाटतो. प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यापेक्षा वारीत माणसांना उराउरी भेटणं, त्यांच्या सहवासात पंधरा-वीस दिवस घालवणं, त्यांची सुखदुःखं वाटून घेणं, इतरांची सेवा करणं यातच आपला खरा पांडुरंग दडलाय असेच प्रत्येकाला वाटत असतं.
म्हणून तर प्रत्येकाची धडपड असते ती वारीचा एकदा तरी अनुभव घ्यायचा. अन्यथा पांडुरंगाचं दर्शन काय वर्षभरात कधी घेता येतं. स्वतःच्या गाडीने, एसटीने वा रेल्वेने! पण त्याला वारी म्हणत नाही हे खरेच!
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
पंढरीची वारी कुठे आहे ?
आळंदी ते पंढरपूर असा साधारण २०० ते २५०कि.मी. चा पायी प्रवास