15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi | Marathi Sakha
15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi | Marathi Sakha

भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi

व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि देशभक्तीने प्रेरित झालेले श्रोतेगण या सर्वांना वंदन आणि ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून इंग्रजांचा युनियन जॅक उतरवला गेला. अन् करोडो भारतीयांना ललामभूत ठरलेला आपला तिरंगा झेंडा भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकवला गेला. अन् समस्त भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.

“स्वातंत्र्य” ! ज्याच्यासाठी भारतमातेच्या हजारो सुपुत्रांनी आंदोलने केली, तुरुंगवास भोगला, कित्येक क्रांतिवीरांना मृत्यूदंड मिळाला. कित्येकांच्या घरादाराची होळी झाली. त्या सर्वांच्या आशा आकांक्षापूर्तीचा क्षण. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडकणारा तो तिरंगा पहाण्याचं भाग्य अनेकांच्या नशिबात नव्हतं. पण ज्यांनी तो सोहळा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनुभवला ते धन्य झाले.

तसे पाहिले तर भारत एक लोकशाहीवादी,साम्यवादी विचारधारेचे निधर्मी राष्ट्र आहे. जगातील फारच कमी देशात अशा प्रकारच्या लोकशाहीचे पालन होत असेल. आणि याचा समस्त भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या राष्ट्रांमध्ये लोकशाही येऊन तीन चारशे वर्षे झालीत.

त्यामानाने भारताची लोकशाही फक्त ७६ वर्षांचीच म्हणजे लहान बाळाएवढीच म्हणावी लागेल. पण तरीही गेली ७६ वर्षात भारताने जी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, शेती आणि अवकाश अशा विविध क्षेत्रात जी प्रगती केली आहे.

ती विशेष वाखणण्यासारखी आहे. कारण जवळ जवळ ८०० वर्षांची मुस्लिम राजवट, त्यानंतर १५० वर्षांची इंग्रजी राजवट! या परकीय सत्तेने एवढ्या वर्षात भारताचे आर्थिक शोषण केले. अन् त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानसिक खच्चीकरण केले.

त्यावेळी सारे भारतीय एका मानसिक गुलामगिरीत जगत होते. आपली वैभवशाली संस्कृती, परंपरा, देदीप्यमान इतिहास, कला,साहित्याचा अभिमान वाटावा असा ठेवा सारं सारं माणसं विसरून गेली होती. अशा काळ्याकुट्ट परिस्थितीला छेद देत स्वातंत्र्यानंतर भारत पुढे सरसावला. आपली संस्कृती, आपल्या वैभवशाली परंपरा अन् इतिहास त्याने पुढे आणला.

लोकांना आपल्या सुवर्णमयी इतिहासाची नव्याने ओळख करून दिली. अन् मग सारे भारतीय एकजुटीने तयार झाले नवभारताच्या नवनिर्माणासाठी! आणि म्हणूनच आजचा हा उद्यमशील भारत जगाच्या नकाशावर आपले स्थान बळकट करून उभा आहे.

उद्योग, शेती, पाणी, शिक्षण, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन , संगणक आणि जीवनमान या सार्‍या क्षेत्रात भारत आणि भारतीय भरारी मारू लागलेत. परदेशात उच्च शिक्षण घेणार्‍यांची आणि स्थायिक होणार्‍यांची संख्या दिवसेन् दिवस वाढत आहे.

जगातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीयांची नेमणूक होत आहे. कितीतरी भारतीय उद्योगपतींनी परदेशातील कंपन्या विकत घेऊन त्या यशस्वी पद्धतीने चालवून दाखवल्या आहेत. त्यामुळेच भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.

मित्रांनो, हे सर्व शक्य झाले. केवळ आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे एवढे मात्र नक्की! आजच्या पिढीला हे माहीत नाही की भारतीयांना परकीय शक्तीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी किती बलिदाने द्यावे लागली. पण ती जाणीव ठेवून स्वातंत्र्याचं जीवापाड रक्षण करायला हवं.!

आजच्या भारताचं वरवरचं चित्र खूप छान दिसत असलं तरी अजून खूप काम बाकी आहे. लोक अजूनही शिक्षित नाहीत. त्यामुळे लोकशाहीला धोका संभावू शकतो.

धर्म, जात, प्रांत,भाषेच्या पलिकडे जाऊन मतदान केले पाहिजे, जातीपातीतला दुरावा, धर्माधर्मातला वितंडवाद कमी झाला पाहिजे. अजूनही खेड्यापाड्यात वीज, रस्ते, शाळा, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आरोग्याच्या सुविधा नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. गरिबीचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रचंड लोकसंख्या,पर्यावरणीय असमतोल, प्रदुषित समुद्र आणि नद्या, उघडे बोडके डोंगरे, वन्यप्राण्यांची तस्करी, स्त्रियांवरील अत्याचार, रहदारीचे नियम आणि सार्वजनिक अस्वच्छता अशा विविध प्रश्नांचा भस्मासूर आपल्याला वाकुल्या दाखवतो आहे.

अशा वेळी नव्या पिढीने खूप जबाबदारीने पावले उचलून राष्ट्राचा गाडा ओढला पाहिजे. अन् एक चांगले भारत राष्ट्र कसे निर्माण होईल हे पहावे लागेल. आणि जे सार्‍या जगाला मार्गदर्शक ठरेल.

आजच्या स्वातंत्र्यदिनी नव्या राष्ट्र निर्मितीची खूणगाठ मनाशी बांधून आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करूया तरच खर्‍या अर्थाने काळाच्या पडद्या आड गेलेल्या असंख्य देशभक्तांच्या मनास आपला अभिमान वाटेल.

॥ जय हिंद जय भारत॥

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

15 ऑगस्ट का भाषण मराठी?

व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि देशभक्तीने प्रेरित झालेले श्रोतेगण या सर्वांना वंदन आणि ७६ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 15 ऑगस्ट भाषण मराठी

आपण 15 ऑगस्ट का साजरा करतो?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी १५० वर्षांच्या इंग्रजी राजवटी पासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले . म्हणून आपण १५ ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो .

76 वा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी आहे?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्यदिवस हा ७७ वा स्वातंत्र्य दिन आहे . १५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्यदिवस हा 76 वा स्वातंत्र्य दिन होता.

Leave a comment

error: