आमची मुंबई ,आपली मुंबई , स्वप्नांचं शहर अश्या अनेक नावानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराचं दर्शन घडवणारा हा लेख….

एक आंतरराष्ट्रीय शहर, भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांचं शहर, मायानगरी, उद्योगनगरी,चित्रपटनगरी, क्रिकेटचं माहेरघर,घड्याळाच्या काट्यावर सतत धावणारं, सव्वाकोटी लोकसंख्या पोटात घेऊन राहाणारं
जगप्रसिद्ध शहर! एका बाजूला गगनाला भिडणार्या उंच उंच इमारती, चकचकीत रस्ते, त्यावर धावणार्या मर्सिडीज, ऑडी सारख्या प्रख्यात चारचाकी गाड्यांची रेलचेल तर दुसर्या बाजूला विस्तिर्ण पसरलेली झोपडपट्टी, त्यातून जाणारे चिंचोळे अरूंद रस्ते, फुटलेली गटारे, तिथं प्रचंड संख्येने राहाणारी माणसं, एका बाजूला ऐश्वर्य, सुबत्ता अन् श्रीमंतीत लोळणारी लोकं अन् दुसर्या बाजूला दोन पैसे मिळविण्यासाठी घाम गाळणारी माणसं.
असं असलं तरी मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही. अगदी भिकारीदेखील चार पैसे सहज मिळवतो. इथे किती तरी दानशूर व्यक्ती,संस्था आहेत त्या गरीबांना मोफत भोजन देत असतात. काही ठिकाणी तर अल्प किमतीत पोटभर नाष्टादेखील मिळतो. आणि हो मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव तर अवघा दहा रुपयात मिळतो. एक वडापाव अन् एक ग्लास पाणी यावर दिवसभर गुजराण करणारी असंख्य माणसं मुंबईत आहेत.
इथे प्रत्येकाची स्वप्नं पूर्ण होतात. म्हणूनच संपूर्ण भारतातून लोकांची येथे रीघ लागलेली असते. इथे प्रत्येकाला आपल्या कुवती प्रमाणे पैसा कमावता येतो. आपली बुद्धी,कौशल्य वापरून प्रसिद्धी पैसा मिळवता येतो. उद्योग म्हणा, नोकरी म्हणा वा एखादा छोटा व्यवसाय म्हणा विविध प्रकारच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
अगदी कुणी नंदीबैल घेऊन, कुणी पहाटेच्या वेळी गाणी गात फिरणारे वासुदेव, कुणी कडकलक्ष्मी बनून पोतराजाच्या वेशात, तर कुणी तारेवर कसरत करणारे डोंबारी असे अनेक कलावंत हातावर पोट घेऊन मुंबईत वर्षोनुवर्ष राहात असतात. त्याला कारण म्हणजे इथले वातावरण, इथला स्थानिक मराठी माणूस.
साधा, निर्मळ मनाचा, सर्वांना सामावून घेणारा, सहिष्णू त्यामुळे परराज्यातून आलेल्या भारतीयांना इथे स्थायिक होण्यात कोणतीच अडचण नसते. म्हणूनच मुंबई सर्वांची, बहुभाषिक अशी बनली आहे. भारतातील विविध प्रांतातील सण, उत्सव मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यातही सार्वजनिक गणेशोत्सव ही मुंबईची जागतिक ओळख आहे मित्रांनो.

मुंबादेवी हे पुरातन मंदिर मुंबईत आहे. त्यावरूनच मुंबईला “मुंबई” हे नाव पडले आहे असे मानतात. मुंबईचे “बाॅम्बे” हे नाव पोर्तुगीज भाषेवरून पडले आहे. “बोम्बो बेहिया” म्हणजे उत्कृष्ट बंदर असा याचा अर्थ आहे. सात बेटांचं शहर आज आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे.
महाराष्ट्राची राजधानी अन् भारताची आर्थिक राजधानी बनले आहे. तिच्या जडणघडणीत मराठी माणसाची भूमिकाही महत्त्वाची आहे. मुंबई मिळविण्यासाठी त्याला मोठा लढा द्यावा लागला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारावी लागली. १०५ हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
पण एवढा मोठा लढा उभारून आज मराठी माणूस मुंबईत कुठे आहे. मोठे उद्योग पारशी, गुजराती लोकांचे आहेत. हाॅटेल व्यवसाय दाक्षिणात्य लोक सांभाळतात, टॅक्सी, रिक्षा व्यवसाय पंजाबी, मुस्लिम ,फेरीवाला विभाग उत्तरेकडील लोकांच्या हातात तर बांधकाम व्यवसाय राजस्थानी लोकांनी घेतला आहे.
मुंबईतला कापड उद्योगात मराठी माणूस होता. तो कापड उद्योग मुंबईतून केव्हाच इतिहास जमा झाला आहे. गिरगाव, माझगाव, वरळी,दादर ही मराठी बहूल ठिकाणं सोडून मराठी माणूस कल्याण, विरार गाठू लागला आहे. नको त्या भूलथापांना बळी पडून मराठी तरुण आपल्या भविष्याकडे दुर्लक्ष करू लागला. मग आपोआपच तो या शर्यतीत मागे पडला.
अन् मुंबई त्याच्या हातातून वाळूसारखी निसटून जावू लागली. पण मुंबईचं आकर्षण आजही आहे. अन् उद्याही राहाणार आहे.
कारण मुंबई आहेच मुळी मायानगरी….तुमची आमची स्वप्न नगरी….!!!
मुंबई कोणत्या राज्यात आहे?
मुंबई शहर हे महाराष्ट्र राज्यात असून , मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीचे शहर आहे .
मुंबई मध्ये किती जिल्हे आहेत?
मुंबई शहर हे एक महारष्ट्रातील ३६ जिल्ह्यांन पैकी एक जिल्हा आहे .
द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली?
द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 .