नमस्कार मित्रहो,
आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आहे. केवळ शिक्षणाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालण्याचं काम आंबेडकर यांनी आपल्या जीवन कार्यात करून दाखवले. गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्य भारतीय समाजाला जागं करून त्यांच्यात आत्मविश्वासाचे बीज पेरण्याचं काम त्यांनी केलं. शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी गांजलेल्या समाजाला दिला.

वर्षानुवर्ष तथाकथित उच्च वर्णीय समाजाच्या छळवादाला तोंड देत जगणारी माणसं आंबेडकरांनी पाहिली होती. नव्हे नव्हे त्या छळाचे, त्या अपमानाचे चटके त्यांनी स्वतः अनुभवले होते. भोगले होते.
या हिंदू समाजाने आपल्याच काही लेकरांचे जीवन नरकमय करून टाकले होते आणि म्हणूनच 1935 मध्ये धर्मांतराचा निर्णय जाहीर केला.कारण दलितांना प्राण्यांहूनही अधिक यातनामय जीवन जगावे लागत होते. त्यांना सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्यास बंदी होती. कोणत्याही मंदिरात जाण्यास त्यांना मनाई होती. खरंतर हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाला ईश्वर पूजा करण्याचा अधिकार होता.
परंतु जातीभेदाच्या नावाखाली जनतेचा हा हक्क नाकारला गेला होता. त्याचबरोबर शिक्षण घेण्यास , सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास त्यांना पूर्णपणे बंदी होती. पेशव्यांच्या काळात जाती व्यवस्थेने तर कहर केला होता. तथाकथित अस्पृश्य लोकांनी रस्त्यावर कुठे थुंकू नये म्हणून त्यांना गळ्यात मडके अडकवावे लागत होते. त्यांची सावली कुठल्याही उच्च जातीच्या लोकांवर पडू नये म्हणून सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडण्यास त्यांना मनाई होती. त्याचबरोबर रस्त्यावरून चालताना मातीत उमटलेली त्यांची पावले पुसली जावीत म्हणून कमरेला झाडाची फांदी बांधून त्यांना प्रवास करावा लागत असे.
जेणेकरून त्यांची मातीत उटलेली पावले पुसली जातील. अशा भयंकर मानसिक छळाला समाजाचा एक गट बळी पडत होता. वर्षानुवर्ष केलेल्या या छळामुळे त्यांची मानसिकता हीच बनली होती की, तथाकथित उच्च सांगतील तसं ऐकावं, ते सांगतील तेच खावं-ल्यावं आणि ते बोलतील तेच ऐकावं. शिक्षणाचा अधिकार नाही, कामाचा अधिकार नाही, स्वातंत्र्याचा अधिकार, स्वतःची मते व्यक्त करण्याचा अधिकार नाही. अशा समाजाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील लष्करी नोकरीत होते. त्यांच्या वडिलांचे हे चौदावे अपत्य होते. आंबेडकरांनी अत्यंत हालाखीची परिस्थिती असूनदेखील केवळ शिक्षण हेच आपले भविष्य आहे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात ठेवून खूप अभ्यास केला. खूप वाचन केले. कोलंबिया विद्यापीठात जाऊन पीएचडीची पदवी मिळवली. न्यूयॉर्क कोलंबिया विद्यापीठातून राज्यशास्त्र मधून एमए पदवी घेतली. तर लंडनच्या ग्रेज इन मधून बार एट लाॅ ही पदवी मिळवली. भारतीय समाजाच्या रूढी परंपरांचा आणि धर्माचा तौलानिक अभ्यास केला. अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून मिळवलेल्या ज्ञानाचा, अभ्यासाचा आपल्या समाजाला कसा उपयोग होईल याचा त्यांनी विचार केला.
डॉक्टर आंबेडकर असं म्हणत, “एक वेळ उपाशी राहिलात तरी चालेल, पण एक पुस्तक विकत घ्या आणि ते वाचा. कारण तेच पुस्तक तुम्हाला जगवील. असं सांगितलं जातं की डॉक्टर आंबेडकर ग्रंथालयात जाऊन दिवसभर अभ्यास करायचे. तिथेच चोरून डबा खायचे. अशावेळी ग्रंथालयाचा नियम मोडला म्हणून त्यांची तक्रार ग्रंथापालाकडे केली गेली. तिथे ग्रंथपाल म्हणून एक गोरी व्यक्ती होती.
ते आंबेडकरांची वाचण्याची ध्येयासक्ती पाहून प्रभावित झाले. त्यांनी आंबेडकरांना त्यांनी सांगितले की, “रोज मी तुझ्यासाठी डबा घेऊन येईन तू माझ्याबरोबर डबा खा, आणि हवी तेवढी पुस्तके वाच. ह्याच डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर भारतीय राज्यघटना लिहिली. एक उत्कृष्ट अशी राज्यघटना ज्या राज्यघटनेमध्ये सर्वांना समान न्याय, बंधुता, मानवता आणि स्वातंत्र्य समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना मिळेल याची त्यांनी त्यात तजवीज केली आणि म्हणूनच आज आपला देश भारतीय राज्यघटनेच्या जोरावर प्रगती पथावर आहे.
इथला समाज जुन्या रूढी, परंपरा विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर आंबेडकरांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. कधी काळाराम मंदिर प्रवेश असो, कधी महाडच्या तळ्यावरचे पाणी पिण्याचे आंदोलन असो, तर कधी मनूस्मृतीचे दहन असो. अशा अनेक गोष्टी ज्या हिंदू धर्माला अत्यंत घातक आणि समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या होत्या, समाजातील एका घटकावर अन्याय करणार्या होत्या त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला.
पण एवढा लढा देऊनही हिंदू समाज जागा होत नव्हता. अस्पृश्यांना त्यांचे अधिकार देऊ पाहत नव्हता आणि म्हणूनच 1935 च्या येेवले येथील एका सभेत त्यांनी जाहीर केलं की, “मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” आणि त्याचीच परिणीती पुढे 1956 मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यात झाली. महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ज्या धर्मामध्ये शांती- शांती- शांती याच मंत्राचा उच्चार होतो. याशिवाय त्या धर्मात कोणत्याही जातीभेदाला, उच्च-नीचतेला थारा नाही. सर्व मानव जात एकाच परमेश्वराची लेकरे आहेत असे मानणाऱ्या धर्माचा त्यांनी स्वीकार केला.
मूकनायक, बहिष्कृत मेळा, बहिष्कृत भारत, समता, मानवता अशी अनेक वृत्तपत्रे त्यांनी चालवली. जनता या अंकात त्यांनी “गुलामाला तू गुलाम आहेस असं सांगा म्हणजे तो बंड करून उठेल” हे सुप्रसिद्ध वाक्य त्यांनी प्रसिद्ध केले. हू वेअर द शुद्राज, रिडल्स इन हिंदूझम, यासारख्या असंख्य पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.अंबादेवी मंदिर सत्याग्रह, पर्वती मंदिर सत्याग्रह, नाशिकचे काळाराम मंदिर सत्याग्रह अशा अनेक ठिकाणी त्यांनी मंंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केले. समता समाज संघाची स्थापना केली. इंग्रजांनी लंडनमध्ये भरवलेल्या तीनही गोलमेज परिषदेत जाऊन दलितांचे हक्क आणि त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा केला. यातूनच पुढे सुप्रसिद्ध असा “पुणे करार” आकारास आला. दलितांसाठी गांधीजींनी वापरलेल्या “हरिजन” या शब्दाला त्यांनी प्रचंड विरोध केला.
अशा या महामानवाने हजारो वर्ष खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. एका वेगळ्या प्रकारची सामाजिक क्रांती घडवून आणली. म्हणूनच त्यांना क्रांतीसूर्य असे म्हटले जाते. प्रचंड ज्ञानाच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केले. म्हणूनच त्यांना ज्ञानसूर्य असेही असे म्हटले जाते. आज देशामधील लाखोंचा समुदाय की जो अज्ञानामध्ये, गरीबीमध्ये जगत होता त्या समाजाला आत्मभान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. स्वतः जातीभेदाचे चटके सोसून, प्रसंगी पोटाला चिमटा काढून, शाळा शिकून, संघर्ष करून स्वतःचे हक्क मिळावे हे त्यांनी समाजाला सांगितले. समाजाची अस्मिता त्यांनी जागी केली
आणि त्यातूनच पुढे दलितांची एक मोठी चळवळ उभी राहिली. दलित समाजातील अनेक लेखकांनी साहित्य निर्मिती केली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात हा समाज प्रगती करू लागला. एक प्रकारे तो समाज इतर समाजाच्या बरोबरीने चालू लागला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महान कार्य आहे. त्यांच्या कार्याला सलाम.
खरंच महाराष्ट्रामध्ये किती मोठी माणसं होऊन गेली. त्यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला, जगाला एका वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम केले आहे . महाराष्ट्राला वीरांची परंपरा आहे तशी संतांची परंपरा आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सुधारकांचीही मोठी परंपरा आहे.
महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत असंख्य लोकांनी हे महाराष्ट्र समाजमंदिर उभारण्याचं काम केलेलं आहे. या समाज मंदिरातले आपणही एक घटक आहोत. आपलीही काही जबाबदारी आहे. आपण शिकून स्वतःबरोबरच समाजातील इतर मागास घटकांना आपल्या बरोबरीने पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.
या महापुरुषांच्या प्रकाशमय तेजस्वी जीवनातील प्रकाशाचा एक कण जरी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला तर आपलेही जीवन उजळून निघेल.
ही सर्व मंडळी न्यायासाठी, सत्यासाठी झगडणारी होती आणि म्हणूनच शेवटी मला हेच म्हणावसं वाटतं की,
जे बेभान होतात सत्यासाठी
तेच उजळून निघतात
आकाशाच्या फळ्यावरती
त्यांचंच नाव लिहितात
आकाशाच्या फळ्यावरती
त्यांचंच नाव लिहितात!
बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर सत्यासाठी- न्यायासाठी लढले आणि म्हणूनच त्यांच्या हातून अलौकिक असं कार्य पार पडलं. अगदी प्रतिकूल परिस्थिती असताना, समाजाचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी कोणालाही जुमानले नाही.
सत्याची-न्यायाची बाजू घेऊन लढत राहिले आणि म्हणूनच आज त्यांचे नाव आकाशाच्या फळ्यावर लिहिले दिसते आहे.
या महामानवाला माझा सलाम…..