
माणूस असो वा प्राणी-पक्षी अगदी कुणालाही विचारा “तुम्हाला सर्व प्रथम काय हवे?” तर तो सांगेल नव्हे अगदी ठामपणे सांगेल “स्वातंत्र्य!” अगदी भुकेने कासावीस झालेल्या दरिद्री माणसापुढे तुम्ही एका हातात भाकरी अन् दुसर्या हातात स्वातंत्र्य घेऊन उभे राहिलात तरीही तो स्वांतत्र्याचीच किंवा एकाच वेळी दोन्हींची निवड करेल. तर सांगायचा मुद्दा हा की स्वातंत्र्य ही नैसर्गिक प्रेरणा आहे. ती तो मिळविल्याशिवाय राहात नाही. त्यासाठी संघर्ष करतो. प्रसंगी मरण पत्करतो!
याच स्वातंत्र्याच्या उपजत प्रेरणेच्या जोरावर अनेक देशांमध्ये चळवळी उभ्या राहिल्या. कारण माणूस सुरुवातीच्या काळात, जेव्हा तो अप्रगत अवस्थेत होता तेव्हा मानवी समाजात “बळी तो कान पिळी” चे राज्य होते. म्हणजे जे सामर्थ्यवंत होते, ताकदवर होते ते दुबळ्यांवर राज्य करीत होते. त्यांना गुलाम करीत होते. यामुळे पृथ्वीतलावरील अनेक राष्ट्रे पारतंत्र्यात होती. मग अनेक राष्ट्रांत आंदोलने सुरू झाली. त्यात भारतही होता.
आपला देश प्राचीन संस्कृती असलेला, उंच पर्वतमाला, नद्या नाल्यांनी आणि सुपिक जमिनी यामुळे समृद्ध असा देश होता. यामुळे सहाजिकच परकीयांची वाकडी नजर भारताकडे वळाली. पाचव्या- सहाव्या शतकापासूनच भारतीय भूमीवर परकीय शासकांची धाड पडू लागली. त्यापूर्वी चंद्रगुप्ताच्या काळातही ग्रीकांनी भारतावर आक्रमणाचा प्रयत्न केलेला होताच. पण तो त्यावेळी परतवून लावण्यात चाणक्य आणि त्यांची शिष्य मंडळी यशस्वी ठरली होती, पण आठव्या शतकापासून मुस्लिम सत्तेचा शिरकाव भारतात झाला. अन् बघता बघता अवघा भारत इस्लामी सत्तेच्या टाचेखाली आला.
पुढे सातशे- आठशे वर्षांनी इंग्रजांचे भारतावर आक्रमण झाले. अन् दीडशे दोनशे वर्ष पुन्हा वेगळ्या सत्तेखाली भारत भरडला गेला. एवढा काळ भारतीय माणूस पारतंत्र्यात राहिल्याने त्याची अवस्था दयनीय झाली होती. अन्याय, अत्याचाराने कळस गाठला होता. सर्व गृह उद्योग बंद पडले होते. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. गरिबी, रोगराई तर पाचवीला पुजली होती. शिक्षणाचा प्रचंड अभाव होता. अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा मनावर होता. धार्मिक कर्मकांड आणि परंपरांचे स्तोम माजले होते.
एकूणच सार्या भारतीयांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. अशा वेळी एखाद्या बलदंड परकीय सत्तेविरोधात जनमत तयार करणे ही अतिशय अवघड गोष्ट होती. पण हे शिवधनुष्य आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या समाजधुरीणींनी यशस्वी पार पडली.
१८८५ साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी कधी मवाळ धोरण स्विकारून तर कधी जहाल धोरणाचा पुरस्कार करून इंग्रज सरकारकडे आपल्या स्वातंत्र्याकरिता लढा चालू ठेवला. दुसर्या बाजूला जनजागृती करून लोकांना एकत्र करण्याचे, इंग्रज सरकार विरोधात लढण्याचे, देशाप्रती समर्पणाची भावना तयार व्हावी म्हणून प्रयत्न केले जात होते.
महाराष्ट्राचा विचार करता लोकांवर आपल्या विचारांचा प्रभाव टाकणारे पहिले प्रभावी नेते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य जहाल विचारांचे होते. केसरी, मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी आपली लेखणी तलवारी सारखी चालवली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच.” अशी गर्जना त्यांनी केली. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा जहाल प्रश्न ते सरकारला विचारू लागले. यातूनच पुढे त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसुत्री आणली अन् सारा भारत ढवळून निघाला.
पुढे याच परिस्थितीवर आरूढ होऊन महात्मा गांधींनी राष्ट्रीय चळवळ अगदी तळागाळात पोहोचवली. तेव्हा सत्याग्रहात स्त्रियांदेखील मोठ्या प्रमाणात भाग घेऊ लागल्या. तरुणमुले मुली आंदोलनात भाग घेऊ लागली यामुळे सारा देश ढवळून निघाला. देशात अनेक क्रांतीकारक जन्माला आले. देशासाठी हसत हसत फासावर गेले. केवळ स्वदेश आणि त्याची पारतंत्रता ही एकच गोष्ट त्यांना सलत होती. त्या एकमेव प्रेरणेवर अनेकांनी देशासाठी महान कार्ये केली.
देशाला स्वातंत्र्य मिळालं. मिळालं की मिळवलं. दिलं की घेतलं! जनतेचा रेटा की जागतिक परिस्थितीचा इंग्लंडवर दबाव या चर्चेत न पडता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची. त्यासाठी अनेकांचे हौतात्म्य कामी आले. अनेक छोट्या, बड्या राजकीय, सामाजिक नेत्यांचे परिश्रम कामी आले. सामान्य जनतेचा सहभाग महत्त्वाचा ठरला.
देशाची फाळणी झाली. ती का झाली? ती आवश्यक होती का? फाळणीला कारणीभूत कोण? आज इतक्या वर्षांनतर फाळणी झाली हे योग्य झाले की अयोग्य झाले? यावर नंतर चर्चा करू. पण फाळणी होऊन दोन देश निर्माण झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेक देशप्रेमींचं स्वप्न पूर्ण झालं .
कविवर्य वसंत बापट यांच्या एका कवितेची आज मुद्दाम आठवण येते…..
शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट !
अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा
अधिक वाचा –
15 ऑगस्ट का साजरा केला जातो?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजी राजवटीपासून स्वतंत्र झाला .. तेव्हापासून दरवर्षी आपण 15 ऑगस्टला हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो.
२०२३ हा ७६ वा स्वातंत्र्यदिन आहे का?
15 ऑगस्ट 2023 हा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे
भारत इंग्रजी राजवटीपासून स्वतंत्र झाला. भारत एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र झाला .