1 May Maharashtra Din | महाराष्ट्र दिन | महाराष्ट्र दिन माहिती

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. खरंतर इंग्रजांना वाटत होतं की भारत हे एक राष्ट्र बनू शकत नाही. कारण भारतामध्ये अनेक धर्म, असंख्य जातीपाती आणि असंख्य भाषा आहेत. एक धर्म, एक भाषा ही राष्ट्र बनण्यासाठी जी आवश्यक अट आहे ते भारतीयांकडे नव्हती. परंतु महात्मा गांधी आणि त्या काळातील इतर राजकीय नेत्यांना या गोष्टीची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी भाषावार प्रांत रचनेचा आग्रह पहिल्यापासून धरला होता. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले.

1 May Maharashtra Din - महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र दिन माहिती - Marathi Sakha
1 May Maharashtra Din – महाराष्ट्र दिन – महाराष्ट्र दिन माहिती – Marathi Sakha

1 May Maharashtra Din | महाराष्ट्र दिन | महाराष्ट्र दिन माहिती

पण भारताची भाषावार प्रांतरचना करावी असे ठरवले असतानाही या गोष्टींना पंडित नेहरू आणि आदींनी विरोध केला. त्यांना असं वाटत होतं की जर भाषावार प्रांत रचना केली तर आपल्या देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळामध्ये राज्यांना भाषावार प्रांत करून प्रत्येक भाषेचं एक राज्य देण्यास पंडित नेहरूंनी विरोध केला.

परंतु १९५३ मध्ये पोट्टी श्रीरामुलू या काँग्रेस कार्यकर्त्यांने तेलुगू भाषिकांचे आंध्रप्रदेश हे वेगळं राज्य हवे म्हणून त्रेपन्न दिवस उपोषण केले अन् दुर्दैवाने त्यांचा त्यात मृत्यू झाला. मग लोकक्षोभ आणि लोकभावना लक्षात घेऊन १९५३ मध्ये आंध्रप्रदेश या तेलुगू भाषिक राज्याची निर्मिती करण्यात आली. नंतर मग विविध प्रांतातून आपले भाषिक राज्य मिळावे यासाठी आंदोलने होऊ लागली.

पुढे त्यातूनच फाजल अली आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाच्या शिफारशीनुसार १९५६ मध्ये अनेक भाषा समूहांना आपापले भाषिक राज्य देण्यात आले. परंतु केवळ दोन अपवाद करण्यात आले. ते म्हणजे महाराष्ट्र- गुजरात आणि पंजाब-हरियाणा यांना वेगळे राज्य देण्यास आयोगाने नकार दिला.

त्यानंतर मात्र महाराष्ट्राची जनता या अन्यायाच्या विरोधात पेटून उठली आणि मराठी भाषकांचं मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झालंच पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळ असे मोठे आंदोलन उभे राहिले. प्रल्हाद केशव अत्रे, एस एम जोशी, सेनापती बापट, काॅॅम्रेेड डांगे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे अशी असंख्य मंडळी आंदोलनात उतरली. शेतकरी आणि कामगार असा एकत्रित लढा लोकांनी उभारला.

भारताचे तत्कालिन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी या अन्यायाविरोधात आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात हा मुंबई प्रांताचा भाग होता. मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे होते. त्यांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच १०६ हुतात्मे झाले. लोकांची स्वयंस्फूर्त चळवळ दडपणं सरकारला शक्य झाले नाही. शेवटी महाराष्ट्राला एक मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याला मान्यता दिली. मराठी भाषिकांचे एक मोठे राज्य निर्माण झाले.

नवराज्याचा तो मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी हाती घेतला आणि तेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. पुढे थोड्याच अवधित एक प्रगतिशील, औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले, पुरोगामी विचारसरणीचे राज्य म्हणून महाराष्ट्राने नावलौकिक कमावला. मुंबई ही राज्याची राजधानी बनली, तर नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. शिवाय आपल्या कार्यसंस्कृतीमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बनली.त्याचबरोबर आर्थिक असो, सामाजिक असो वा राजकीय असो अनेक कारणांमुळे महाराष्ट्र राज्य हे देशात कायमच अग्रेसर राहिले.


तर असे हे आपले महाराष्ट्र राज्य ! १ मे १९६० रोजी जरी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असली तरी, महाराष्ट्र या शब्दाचा इतिहास खूप जुना आहे. त्या काळातील विदर्भ, कोकण, मल्ल, अश्मक, कुंतल या पाच राष्ट्रिके मिळून म्हणजेच पाच प्रांतांचा मिळून एक महाराष्ट्र हा प्रदेश तयार झाला आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची तशीच संतांची अन् समाजसुधारकांची भूमी आहे. इथला माणूस संत ज्ञानदेवांच्या ओवीत अन् शिवरायांच्या शौर्यकथांमध्ये रमतो. स्वभावाने थोडासा रांगडा, पण मनाने तो हळवा आहे. त्याच्या लेखी आधी देश मग राज्य!

राजा बढे यांच्या लेखणीतून अवतरलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले अन् कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायलेले गीत……जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारले आहे.


आज या १मे च्या दिवशी आपण सारे वचनबद्ध होऊ या की, या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे वर्तन मी करणार नाही. या उलट राज्याच्या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करीन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती आंदोलनात ज्या हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि मी आपली रजा घेते
जय महाराष्ट्र

1 May Maharashtra Din | महाराष्ट्र दिन | महाराष्ट्र दिन माहिती | Video

1 May Maharashtra Din – महाराष्ट्र दिन – महाराष्ट्र दिन माहिती – Marathi Sakha

Leave a comment

error: